गुप्त समेवर - भाग १८ (अंतिम भाग)
मागील भाग: गुप्त समेवर - भाग १७
गुप्त समेवर - भाग १८ (अंतिम भाग)
डोळ्यांवरील चश्मा
व्यवस्थित करत घामाघूम झालेला अविनाश आत येत होता, त्याच्या
डोक्यावर कॅप नव्हती. रीयाने त्या फोटोतील व्यक्तिला ओळखलं होत...मुग्धाला पण आता
अविनाशची खरी ओळख पटली होती, जिवाच्या आकांताने तिने आवाज
दिला...
“वाचवा मला, सोडवा मला...बाबाSSS...”
अविनाश झपाझप चालत
मुग्धाकडे गेला. ते पाहून रीया त्वेषाने बोलली,
“खबरदार तू मुग्धाला काही
केलस तर, माझे पप्पा तुला सोडणार नाहीत. का बांधुन ठेवलं आहे आम्हाला? सोड...”
रीया बोलत असताना तिचे
पप्पा, कमिशनर देशमुख त्या खोलीत आले, रीयाला उद्देशून ते
म्हणाले,
“आत्ता आली का पप्पाची
आठवण? हे सगळे उपद्व्याप करण्याआधी सांगवस वाटलं नाही?”
“सॉरी पप्पा! इथे अस काही
होईल याची कल्पना नव्हती मला. पप्पा प्लीज सोडवा आम्हाला.. हा माणूस खूप डेंजर आहे, याने वसुंधरा मॅडमला पण...”
रीया अविनाशकडे पाहून
तिच्या पप्पांना सांगू लागली आणि अविनाशच्या मिठीत रडत असलेल्या मुग्धाला पाहताच
अवाक झाली…अविनाश मुग्धाच्या डोक्यावरुन अतीव प्रेमाने हात
फिरवत होता, त्याच्या डोळ्यातून पण अश्रु झरत होते. अविनाशच मुग्धाच्या
भूतकाळातील खलनायक असून त्यानेच त्यांना बांधून ठेवले आहे,
असा रियाचा समज झाला होता. पण समोरील दृश्य पाहून रीया पुरती चक्रावून गेली.
तोपर्यंत कमिशनर देशमुखांनी रीयाला सोडवल, तिला जवळ घेऊन ते
थापटू लागले,
“अस गोंधळून जाऊ नको बेटा, इतक्या वर्षांनी बापलेकीची भेट झाली आहे! मुग्धाला
तिच्या भूतकाळाची आठवण झालेली दिसतेय!”
रीयाने चमकून कमिशनर देखमुखांकडे
पाहिलं आणि म्हणाली,
“म्हणजे…अविकाका मिनूचे खरे बाबा आहेत??? मग इतके दिवस ते
काहीच का बोलले नाहीत. तुम्हाला पण हे सगळ माहिती होत का पप्पा? आणि आम्हाला इथे डांबून कुणी ठेवलं?
“हो बेटा, मला सगळं माहीत होत. थोडा धीर धर, तुझ्या सगळ्या
प्रश्नांची उत्तर मिळतील तुला. अविनाश, तू पोरींना फ्लॅटवर
घेऊन जा. मी आधी पोलिस स्टेशनला जाऊन त्या हरामखोराचा पुरा बंदोबस्त करून येतो.”
अविनाशकडे रीयाला सोपवून
कमिशनर देशमुख खोलीतून बाहेर पडले. अविनाश मुग्धा आणि
रीयाला उद्देशून म्हणाला,
“कालपासून नुसता जीवाला
घोर लागला होता, तुमच्या गायब होण्याने! आता चला इथून.”
अंगात त्राण नसल्याने डोक्यात असंख्य प्रश्न असूनसुद्धा रीया
मुकाट्याने निघाली.
तिघेही फ्लॅटवर जाऊन जरा
फ्रेश झाले, बाहेरून मागवलेले जेवण करून त्यांना जरा तरतरी
आली. मोठ्या उत्सुकतेने रियाने अविनाश आणि मुग्धाला विचारले ,
“आता तरी या पामराला कळेल
का तुमची सारी गोष्ट? माझी उत्क...काय ते?”
रिया डोके खाजवू लागली, तिच्या डोक्यावर टपली मारून मुग्धा म्हणाली,
“उत्कंठा शिगेला
पोहोचली...”
“हम्म..तेच ते! सांगते का
आता? तुला कस आठवलं सगळं? इतके दिवस सारे प्रयत्न करून
पण काहीच आठवत नव्हतं तुला, अविकाका आपल्या आजूबाजूच होते. आज काय चमत्कार झाला???”
“अग डॉक्टर म्हणाले होते
नं, जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने लहानपणी माझी मेमरी लॉस्ट झाली होती, औषधोपचार करून ती परत नाही आली. तसच काही पुन्हा घडलं तर कदाचित माझी
मेमरी परत येऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. जे भीतीदायक डोळे मला
स्वप्नात दिसत होते तेच माधवगड बंगल्यात पुन्हा प्रत्यक्षात मला दिसले आणि माझी
शुद्ध हरपली. त्या राक्षसाचा चेहरा आणि ते खुनशी डोळे पाहून
माझा भूतकाळ जागृत झाला. १६ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या
तसा उभा राहिला. ”
“ओहह...काय झाल होत तेव्हा? तो राक्षस म्हणजे कोण?”
रीयाच्या या प्रश्नाला
अविनाशने उत्तर दिले,
“डॉ.माधव नेने... बिझनेसच्या नावाखाली तस्करीचा धंदा करणारा एक नराधम!"
रिया-
"ओएमजी...म्हणजे आर्यनचे डॅड, वसुंधरा मॅमचे
मिस्टर!"
अविनाश-"यस...त्याचा
खरा चेहरा क्रांतीला समजला म्हणून तर त्याने...”
त्या क्लेशदायी आठवणींमुळे
अविनाशचा आवाज कापरा झाला, मुग्धा पुढे सांगू लागली,
“आईबाबा आणि मी पुण्यामध्ये
आमच्या छोट्याश्या विश्वात आनंदी होतो. माझी जन्मदाती आई म्हणजे क्रांती देशपांडे, एक प्रख्यात इतिहास तज्ञ तर बाबा, यशोधन देशपांडे
उर्फ अविनाश जोशी, एका MNC मध्ये
सॉफ्टवेअर इंजीनियर होते. मला आठवत त्यानुसार मी त्यावेळी 1st स्टँडर्ड मध्ये असेन. बाबा काही दिवसांपासून कामानिमित्त परदेशी गेला
होता. त्यादिवशी बाबा परत येणार म्हणून मी खूप आनंदी होते. शाळा
सुटल्यावर आईऐवजी माधव नेने मला घ्यायला आला होता. वसुमावशीचे मिस्टर म्हणून
त्यांची ओळख होती, आईनेच त्यांना पाठवल असेल म्हणून मी
त्यांच्यासोबत गेले. त्यांनी मला एका पडक्या निर्जन ठिकाणी नेऊन डांबून ठेवले.
रडून आरडाओरडा करताच त्या राक्षसाने माझ्या तोंडावर पट्टी बांधली आणि धमकावले, ‘गप्प बसून राहायच, तुझ्या
आईने जर माझ ऐकल नाही तर तुझा जीव घेईन
मी.’ त्याचे ते हिंस्र पशुसारखे डोळे पाहून भीतीने मी
बेशुद्ध झाले. मला जाग आली तेव्हा बाबा तिथे आला होता, त्याने
त्या गुंडांच्या तावडीतून मला सोडवले आणि घरी आणले अगदी आजच्यासारखे!! मला कस काय
शोधून काढतो रे बाबा तू??”
अविनाश मुग्धाचा हात पकडून
म्हणाला,
“यावेळी तुझ्या हातातील या
स्मार्ट बॅंडमुळे तू माधवगड बंगल्यात कालपासून आहेस हे समजलं, तिथे नक्कीच तू अडचणीत सापडली असणार हे मी ओळखलं आणि कमिशनर देखमुखांना
घेऊन पोहोचलो तिथे. आणि १६ वर्षांपूर्वी अस स्मार्ट बॅंड नव्हतं पण तू नेहमी एक
हेयरबेल्ट वापराची त्यात मी क्रांतीला सांगून एक ट्रॅकिंग चीप बसवून घेतली होती,
त्यामुळे तेव्हा तुला मी शोधू शकलो. त्या माधव नेनेविरूद्ध तेव्हा काहीच पुरावे नव्हते
आणि पोलिसात गेल्यास तुला जीवे मारण्याची धमकी दिल्याने मी एकट्याने तुला त्या दोन
गुंडांच्या तावडीतून सोडवून घरी आणल होत. वसुंधरा आणि क्रांती जिवाभावाच्या मैत्रिणी
होत्या. क्रांतीने माधवबद्दल वसुंधराला सांगितलं तेव्हा तिचा विश्वास बसला नव्हता, उलट वसुंधराने क्रांतिशी बोलणं टाकल होत. पण तुला पळवून नेल्याच वसुंधराला समजलं आणि माधव नेनेचा खरा चेहरा तिच्यासमोर आला. त्याच्याविरोधात आम्हाला मदत
करायच वसुंधराने ठरवलं होत. त्यात धोका असल्याने तुला आणि क्रांतीला मी त्याच
रात्री एका रेकॉर्ड नसलेल्या गाडीतून मुंबईला सुरक्षित ठिकाणी पाठवायच ठरवलं.”
मुग्धाला ती काळरात्र आठवली
आणि तिच्या अंगावर काटा आला. ती बोलू लागली,
“अजूनही स्वप्नात ती रात्र
दिसते मला. मी आणि आई ड्रायवर काकांसोबत मुंबईला निघालो होतो. आईने ते ब्रेसलेट
माझ्या हातात घातल आणि म्हणाली, ‘यातून
तुला माझ संशोधन नक्की काय होत ते शोधायचा मार्ग सापडेल. स्वता:वर विश्वास ठेव धरा, मी कायम तुझ्या सोबतच असेन!’ माझ्या बालमनाला आई
नक्की काय सांगत्येय ते समजलं नाही पण आई मला सोडून जायला नको म्हणून मी तिला घट्ट
बिलगून बसले. घाटाचा रस्ता सुरू झाला गाडी अचानक गाडी वेडीवाकडी वळण घेत जाऊ लागली, ड्रायवरकाका गाडी थांबायचा आटोकाट प्रयत्न करून पण गाडी मुख्य रस्ता सोडून
दरीकडे जाऊ लागली, आईने प्रसंगावधान राखून मला दूर केले आणि
गाडी दरीत कोसळण्यापूर्वी मी गाडीतून बाहेर पडले. माझ्या डोळ्यांसमोर आई गाडीसोबत
दरीत कोसळत होती, मी काहीच करू शकले नाही. डोक्याला मार
लागल्याने माझी शुद्ध हरपली ....”
आईच्या आठवणीने मुग्धा
अविनाशच्या कुशीत शिरून लहान बाळासारखी रडू लागली. रियाच्या डोळ्यात पण पाणी आल. मुग्धाच्या स्वप्नाचा अर्थ आज तिला समजला होता. भावनांचा भर
ओसरल्यावर मुग्धा बोलू लागली,
“त्या धक्क्याने माझा तर
मेमरी लॉस झाला होता पण बाबा तू... तू त्यावेळी मला का शोधल
नाहीस?”
“वसुंधरा माधव नेनेविरुद्ध
पुरावे गोळा करायला मदत करणार होती. तिने मला भेटायला बोलावलं म्हणून मी दुसर्या
दिवशी तिने दिलेल्या पत्त्यावर गेलो. पण तिथे वसुंधरा नाही तर माधव नेने भेटला
मला. वसुंधरा आणि माधव यांनी आपल्याला फसवल आहे, असं वाटलं मला तेव्हा.
गुंडांकरवी मारहाण करून झाल्यावर त्या राक्षसाने तुमच्या अपघाताची
बातमी मला दिली, त्याच माझ्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष
होत. त्या गाडीत बिघाड करून त्यानेच तो अपघात घडवून आणला होता. मला मरणासन्न अवस्थेत एका निर्जन ठिकाणी टाकून तो नराधम निघून गेला. मी
कितीवेळ तिथे पडून होतो, देवास ठाऊक! मला शुद्ध आली तेव्हा
मी एका आदिवासी लोकांच्या झोपडीत पडलो होतो. जवळ जवळ सहा महिन्यांनंतर मी माझ्या
पायावर उभा राहिलो. त्या आदिवासींनी मरणाच्या दाढेतून मला बाहेर काढलं होत.
त्यांचा मी जन्मभर ऋणी असेन. आपली ओळखीची लोक दगा देऊन जिवावर उठतात आणि ही अनोळखी
आदिवासी माणसे जीवनदान देतात, खरच हव्यासापोटी माणूस अगदी
राक्षस होऊन जातो!
असो! त्या दयाळू लोकांचे आभार मानून आणि पुन्हा भेटण्याचे वचन
देऊन मी पुण्यात परतलो. चेहर्यावर अजूनही माराचे बरेच व्रण होते. सर्वात प्रथम मी पोलिस स्टेशनला गेलो आणि त्या अपघाताची चौकशी केली.
माझा अवतार पाहून त्यांनी मला हाकलून लावले पण एका हवालदाराने मला
सारी माहिती दिली. त्याचा असा अंदाज होता की त्या अपघातात गाडी आणि माणसे जळून खाक
झाली असली तरी एक छोटी मुलगी मात्र वाचली आहे. तेवढाच एक आशेचा किरण मला दिसला.
तुझा माग काढत मी मुंबईला आलो. तिथे पीएसआय देखमुख म्हणजे रीयाचा
पप्पा म्हणजे कॉलेजचा माझा जिगरी दोस्त भेटला. माधव नेने हे खूप मोठ प्रस्थ असून
त्याच्याविरोधात जाण सोप्पं नाही हे एव्हाना मला कळून चुकल होत. तू मुग्धा म्हणून
साठे कुटुंबात रूजली होती, यशोदवहिनीच्या रूपात तुला आई
मिळालेली पाहून मी सुखावलो. माधव नेनेचा बदला घ्यायचा तर मी एकटा राहण कधी पण
चांगलं म्हणून मी माझी ओळख, रूप बदलून तुझ्या आजूबाजू वावरू
लागलो. नवी ओळख घेऊन स्थिरावताना आणि माझ्या लेकीपसून दूर राहताना काळीज पिळवटून
जायच माझ! पण तुझ्या सुरक्षिततेसाठी अस
करण क्रमप्राप्त होत!”
“मी समजू शकते बाबा ...”
मुग्धा अविनाशच्या कुशीत
विसावली. रियाने सगळ्यांसाठी कॉफी करून आणली, त्यामुळे सगळे
फ्रेश झाले. मुग्धा म्हणाली,
“म्हणजे वसूमावशीने पण
आपल्याला धोका दिला?”
“मला पण आधी तसच वाटत होत.
म्हणून तर तुला तिच्यापसून दूर रहायला सांगितलं. गेले १५ वर्षे मी त्या माणसाचा माग
घेत होतो. भारतातील प्राचीन वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मोठी किम्मत असते, त्या अवैधरित्या पुरवठा करण्याचा याचा खरा धंदा होता, टेक्स्टटाईल मिल्सचा बिझनेस जगाला दाखवण्यासाठी करी. त्याच्या विरोधी पुरावे गोळा करण मला इतक्या वर्षात शक्य नाही झाल, ते काम वसुंधराने
केल. तिला त्याच्या सगळ्या गैरप्रकारांची माहिती असली तरी ती आर्यनच्या सुरक्षिततेसाठी
गप्प बसून होती. त्या नराधमाने १६ वर्षांपूर्वी ती मला मदत करायच्यावेळी आर्यनला ओलीस
ठेवलं होत, म्हणून तर त्याच सगळं वसुंधराला ऐकाव लागलं. मला पण
ही गोष्ट वसुंधराच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी समजली होती. तुझ्यापासून दूर रहा
म्हणून धमकीवजा फोन मी वसुंधराला केला त्यांनंतर एकदा तिला प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला. ती स्वता: माधव नेनेच्या विरोधात सगळे
पुरावे गोळा करत होती. पार्टीत ती ते जगासमोर आणणार होती. माधव
नेनेचा पाताळयंत्री स्वभाव ओळखून असल्याने यात खूप धोका होता. वसुंधराने सारी जबाबदारी
एकटीवर घेऊन मला या प्रकरणापासून दूर रहायला सांगितलं होत. काही
दगाफटका होऊ नये म्हणून मी त्यादिवशी पार्टीत आलो होतो. तरी पण मी वसुंधराचा मोबाइल
घ्यायला मागच्या बाजूला गेलो तेवढ्या वेळात त्या राक्षसाने डाव साधलाच! तिच्या ग्लासमध्ये
त्याने अस केमिकल मिसळल की, ते घेताच हार्ट अटॅक भासून जागीच
तिचा मृत्यू झाला. माधव नेनेच्या दृष्टीस न पडता मी तुम्हाला घेऊन तिथून तातडीने बाहेर
पडलो. तिच्या मोबाइलवरुन कमिशनर देखमुखच्या मदतीने आम्ही वसुंधराच्या माणसाने गोळा
केलेले पुरावे हस्तगत केले. त्याचा पर्दाफाश करणार इतक्यात तुम्ही त्याच्या तावडीत
सापडला. माधवगड बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि त्या राक्षसाला अटक झाली.”
“ओहह...आम्हाला शुद्ध आली तेव्हा बंगल्यात खाली तो गोंधळ सुरू होता तर...मी तर तुम्हालाच व्हिलन समजले होते. सॉरी काका!”
रिया कान पकडून म्हणाली. रियाचा
तो आविर्भाव पाहून अविनाश खो खो हसू लागला.
“ पण काका मुग्धाच खर नाव काय? आणि क्रांती काकूनी नक्की काय संशोधन केल होत?”
“क्रांतीच्या सर्वात जवळच्या दोन व्यक्तींच्या नावावरून तिने हे नाव ठेवलं होत, तसेच गौतम बुद्धाच्या खूप जवळच्या व्यक्तीच हे नाव आहे, ओळख पाहू रीया?? ”
अविनाश डोळे मिचकावत म्हणाला.
थोडासा विचार करून रीया आनंदात ओरडली,
“यशोधरा!!! यशोधन आणि वसुंधरा
या दोन व्यक्ति काकूंच्या सगळ्यात जवळच्या, शिवाय हे गौतम बुद्धांच्या बायकोचे नाव आहे.
बरोबर न?”
“अगदी बरोबर!!!”
अविनाशने रियाला टाळी दिली, दोघेही हसू लागले. मुग्धा मात्र विचारात पडलेली होती.
अविनाशकडे पहात तिने विचारले,
“बाबा, आई नेमकी कोणत संशोधन करत होती??”
जरासं गंभीर होत अविनाश म्हणाला,
“मला पण नक्की माहिती नाही
बेटा, त्यावेळी मी ऑफिसच्या कामानिमित्त सहा महीने युरोपमध्ये होतो. तेव्हा मोबाइल
सुविधा फारशी नसल्याने आमच बोलणं खूप कमी व्हायचं. तिच्या संशोधनात काही तरी अद्भुत तिच्या हाती लागलं
एवढच मला माहितीये. फोनवर त्या विषयावर बोलणं योग्य नसल्याने मी परत आल्यावर ती सविस्तर
सांगणार होती. कदाचित तीच गुप्त माहिती माधव नेनेला हवी असेल.
मी भारतात आल्या आल्या इतक्या वेगात सर्व घडामोडी झाल्या की,
काही बोलायला वेळच मिळाला नाही....जाऊ दे, आता खूप रात्र झाली
आहे, तुम्ही दोघी शांतपणे झोपी जा बर!.”
गेले दोन दिवस अत्यंत धावपळीचे
गेल्याने तिघांना पण खूप थकवा आला होता. अविनाशच ऐकून मुग्धा आणि रीया बेडरूम मध्ये
गेल्या. रीयाला बेडवर पडल्या पडल्या झोप लागली, मुग्धाच्या डोक्यात
मात्र विचार सुरूच होते. वसुंधराने ठेवलेली वस्तु शोधण्यासाठी त्या माधवगड
बंगल्यात गेल्या पण ती वस्तु न शोधताच परत आल्या होत्या. आईच संशोधन, वसुमावशीने मागे ठेवलेली वस्तु याचा विचार करता करता मुग्धाला कधी झोप लागली
ते कळलंच नाही.
समाप्त!
(मुग्धाला तिच्या अस्तित्वाचा
शोध लागला, गुप्त समेवर या कथेचे पहिले पर्व इथे संपते. शास्त्रीय
संगीतामध्ये ‘समेवर येणे’ म्हणजे जुन्या
आवर्तनाचा शेवट आणि नव्या आवर्तनाची सुरुवात! त्यावरुन “गुप्त समेवर” हे शीर्षक कथेला
देण्यात आले आहे , हे तर रसिक वाचकांना समजले असेलच!!
कथेचे दुसरे पर्व वाचण्याची
उत्सुकता असल्यास कमेन्ट करून जरूर सांगा आणि त्यामध्ये काय वाचण्यास आवडेल हे पण नक्की
कळवा!!!)

Comments